खरंतर #मताधिकार हा शब्द सुरुवातीपासूनच रूढ व्हायला हवा होता. तो तसा असता तर लोक आपल्या अधिकाराबाबत मागाहूनही जागरूक राहिले असते. आपला अधिकार गाजवत राहिले असते. आपण या लोकशाहीचे मालक आहोत, ही लोकशाही व्यवस्थितपणे चालवणे सुस्थितीत ठेवणे, काळानुरूप अधिक सुदृढ करत जाणे ही आपलीच जबाबदारी आहे ही जाणीव नागरिकांमध्ये राहिली असती.
पण, मताधिकाराऐवजी #मतदान हा शब्द आला आणि सगळी गडबड झाली. असं म्हणतात की दान या हाताचं त्या हातालाही कळता कामा नये ! त्यामुळे ते ज्याच्या त्याच्या पुरतं राहिलं, संघटित होऊ शकलं नाही !
शिवाय दान करायचं आणि विसरून जायचं असतं. त्याचाच गैरफायदा ज्यांच्या पदरात ते दान पडतं त्यांनी घेतला आणि ज्यांनी दान केलं त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांनाच पाताळात गाडलं. लोकशाहीची चक्रं त्यामुळेच उलट फिरली. दान करणारे केविलवाणे झालेत आणि याचक मुजोर !
आता तरी आपण सावध व्हायला पाहिजे. ईडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो... असं नुसतं म्हणून चालत नाही तर बळीचं राज्य येण्यासाठी मताधिकारही तशा पद्धतीने बजावता आला पाहिजे. तशी जागरूकता आपल्यामध्ये असली पाहिजे.
https://www.yuvrajyedure.com/By: Yuvraj Ramchandra Yedure